जालना : जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनानं वसुली सुरु केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनानं अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी केली होती. त्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये घोटाळा झाल्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला असून चौकशी सुरू आहे. जालन्यात तहसीलदार यांचे लॉगिन आयडी, पासवर्डचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी लुबाडलं आहे. या प्रकरणी चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी दुबार अतिवृष्टी अनुदान घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळं दुबार अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडून वसुली सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टी अनुदान घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.