अहिल्यानगर (शिर्डी) : "काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळं त्यांना वेगळा वर्धापन दिन साजरा करावा लागतोय. कारण ते काँग्रेसबरोबर गेलेत. बाळासाहेब ठाकरे कधीच काँग्रेसबरोबर गेले नसते. आम्ही करत असलेला वर्धापन दिन हा बाळासाहेबांना आदरांजली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवाय बाळासाहेबांची खरी शिवसेना परिपूर्ण होवूच शकत नाही. कारण बाळासाहेबांच्या स्वप्नातील खरे शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली आणि आज त्याच पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनाचे बॅनर एकनाथ शिंदे यांनी लावले आहेत. वाढदिवसाला शेकडो बॅनर लागतात. मात्र वर्धापन दिनाला किती बॅनर लावले असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. माजी मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या माध्यन्ह आरतीलाही हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.