वटपौर्णिमा नक्की का आणि कशासाठी...

  • 3 years ago
अकोला : वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण. खरं तर या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते असं म्हणायला हवं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. महाराष्ट्रीय महिला हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात. या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आणि त्याची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या नवऱ्यासाठी उपवास ठेवते. पण हे व्रत केल्याने नवऱ्याचे प्राण खरंच वाचतात का? अनादी काळापासून हा विचार कदाचित बायकांना आलाच नसावा आणि महिला असा विचार करतात त्यांना वेड्यात काढलं जातं. पण खरं सांगायचं तर वटपौर्णिमा हे पूर्वीच्या काळी एकत्र जमण्याचं निमित्त होतं. वडाच्या झाडाजवळ चांगला ऑक्सीजन मिळतं तो म्हणजे अगदी दोन्ही अर्थाने. एक म्हणजे श्वासोच्छवासाचा ऑक्सीजन आणि दुसरा म्हणजे आपल्या मैत्रिणींचा थोड्या कालावधीसाठी का असेना पण मिळणारा सहवास. कारण पूर्वी ‘रांधा वाढा उष्टी काढा’ हेच स्त्रियांचं काम होतं. सर्व महिलांना त्याकाळी नटण्याची आणि एकत्र राहण्याची संधी मिळायची. पण आता या सगळ्या रूढी - परंपरा जपणं तितकंसं महत्त्वाचं आहे का? असाही प्रश्न विचारण्यात येतो. पण खरं तर याच पद्धतीने आणि आचाराने आणि विचाराने ही परंपरा जपली तर का नाही? असा प्रतिप्रश्नही करता येईल.

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #akola #akolanews #SakalNews #MarathiNews #Nanded #Corona #Watpournima #अकोला #वटपौर्णिमा